सांगोल्याच्या राजकारणात मोठी पोकळी: माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांचे निधन; निर्भीड नेतृत्व हरपले – शहरावर शोककळा
सांगोला: शंकर काळे – सांगोला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व निर्भीड नेतृत्व म्हणून ओळख असलेले लोकनेते *नवनाथ भाऊ पवार* यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने सांगोला तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
कार्यकाळाची ओळख:
नवनाथ भाऊ पवार यांनी नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहरातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा व स्वच्छता या प्रश्नांवर भर दिला होता. सर्वसामान्य नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी ते कायम तत्पर असायचे. त्यांच्या साधी राहणी, स्पष्टवक्तेपणा व दांडगा जनसंपर्क यामुळे ते सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते. प्रश्नांना थेट भिडणारे निर्भीड नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.
श्रद्धांजलीचा सूर:
सोशल मीडियावर नागरिकांनी “भावपूर्ण श्रद्धांजली” वाहिली आहे. _”आपण केलेले सामाजिक कार्य, आपले मार्गदर्शन आणि आपल्या उपक्रमांची प्रेरणा आम्हाला नेहमीच मार्गदर्शक ठरेल. आपल्या स्मृतीस विनम्र अभिवादन!”_ अशा शब्दांत अनेकांनी भावना व्यक्त केल्या.
_”आपण आमच्या स्मृतीत सदैव राहाल…”_ अशा भावना व्यक्त होत आहेत.
राजकीय-सामाजिक वर्तुळात हळहळ:
नवनाथ भाऊंच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे. अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.नवनाथ भाऊ पवार यांच्या पश्चात संपूर्ण पवार कुटुंबिय आहेत. सांगोला तालुका नवनाथ भाऊंच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना.